महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तसेच, रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Ramesh Bais is the new Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari resignation accepted)
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी रमेश बैस यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही कोंडी होत होती. महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्याची मागणी महाविकास आघाडीने केली होती. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर राज्याची शिंदे-फडणवीस सरकारला कोश्यारींचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल भवनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.
“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले होते.
कोल्हापुरात आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला कोल्हापुरात विरोध झाला होता. शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या युवा सेनेने कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होते.
यावेळी आंदोलकांनी डोक्याला काळया पट्ट्याही बांधल्या होत्या. तसेच भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला फुल्याही मारल्या होत्या. यावेळी विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा असं पत्रकही वाटण्यात आलं होतं.
हेही वाचा – मिशन २०२४ : निष्क्रिय खासदारांना मोदींचा सूचक इशारा; मतदारसंघात फिरा, अन्यथा…