कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनलक्ष्मीचा महाविकास आघाडीने वापर केलाच, त्याही पुढे जाऊन जबरदस्तीने कायद्याचा चुकीचा वापर, पोलीस यंत्रणेचा वापर करून सर्व प्रकारची शक्ती आमच्या विरुद्ध वापरून ही बँक जिंकण्याचा प्रयत्न केला. बेल अर्जावर चार दिवस सुनावणी चालते हे मी ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कधी पाहिले नाही, असंही केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत.
डिजी, अडिशनल डिजी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसले कोणाविरोधात अतिरेक्यांविरोधात? तीन पक्षाचे नेते, मंत्री येतात, राज्याच्या अर्थ खात्याचे मंत्री येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून परत जातात याला अक्कल म्हणतात, असा सणसणीत टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा बँकेतील भाजपाच्या विजयानंतर बोलताना लगावला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. भाजपा आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा बँकवर हे प्रचंड यश मिळवता आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँक आम्ही जिंकली आता आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहे. महाराष्ट्राला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे, लगानची टीम नको, विकसित महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहे. अशा अवस्थेत ते राहू नये या राज्यातील साडेतेरा कोटी जनतेसाठी सुखाची समृद्धीची परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी ११ जागा भाजपाने जिंकून एक हाती सत्ता मिळविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत येऊन सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते
त्यांच्यासोबत अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत तसेच बँकेचे विजयी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँकेवर विजय मिळविताना अक्कलेचा वापर झाला. ज्यांना अक्कल आहे. त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आलेली आहे, असा टोला नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाणला. जिल्हा बँक विजयी केली आता राज्यात भाजपाचे सरकार आणायचे आहे. राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. देशात जसे प्रधानमंत्री मोदी जसे काम करतात तसा राज्यात काम करणारा मुख्यमंत्र्याची गरज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आमदार नितेश राणे यांच्या बद्दल झालेल्या पोस्टरबाजी बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांची पोस्टर लावायचीच लायकी आहे, राज्य कारभार करायची यांची लायकी नाही ना बँकेत ना राज्यात, आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन फिरा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
जिल्ह्यात यापुढे प्रत्येक निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार निवडून येणार आहे. ज्यांना जिल्हा बँकेत 36 मते मिळवता येत नाहीत आणि म्हणे विधानसभा लढविणार, अशा शब्दात सतीश सावंत यांचे नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी खिल्ली उडवली.
यापुढे बारामतीला कर्ज दिलं जाणार नाही
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची बँक आहे. त्यात शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. केंद्र सरकारच्या योजना या जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहेत. बारामतीला कारखाने विकत द्यायला शेतकऱ्यांचे पैसे देणार नाही. सर्वांना पुरून उरलो आहोत. आता केंद्रापर्यंत पोहोचलो आहे, मध्ये कुठे थांबलो नाही. त्यामुळे अशा पोलिसांच्या चौकशी मला काही फरक पडत नाही, असा इशाराच एक प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.