रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेला 22 सप्टेंबर पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने रुपी कोऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही असा ठपका ठेवला आहे.
सारस्वत बँकेत रुपी बँकेच्या प्रस्तावित विलीनीकरण आरबीआयकडू तत्वत: मंजुरी दिली होती. मात्र, यानंतर रुपी कोऑपरेटिव्ह बँकेने 64 हजार हून अधिक लोकांना त्यांच्या ठेवींची परतफेड केल्यानंतर सारस्वत बँकेने विलीनीकरणाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान रुपी बँकेच्या खातेधारकांचे पैसे परत केले जातील असे आश्वासन आरबीआयकडून देण्यात आले आहे.
आरबीआयच्य आदेशात काय –
विशेष म्हणजे, आरबीआयने आपल्या आदेशात रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज चालू ठेवणे ठेवीदारांच्या आणि जनतेच्या हिताच्या विरुद्ध असेल आणि बँक तिच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सध्याच्या ठेवीदारांची पूर्ण परतफेड करू शकणार नाही असे नमूद केले आहे.
बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवीपरत मिळणार ? –
परवानाधारक बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांचा ५ लाखांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जातो. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या लिक्विडेशनवर, सध्याच्या ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून त्यांचा ठेव विमा दावा प्राप्त करण्याचा अधिकार आहे, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशातील माहितीनुसार 99 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. तर फक्त 1 टक्के ठेवीदार 5 लाखांच्या वरची ठेव गमावतील.