मान्सूनने महाराष्ट्रात आगमन केले असून मुंबई शहरात काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम असून मुंबईतील हिंदमाता, सायन, किंन्ग्ज सर्कल अशा सकल भागांत पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल देखील ठप्प झाली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Regional Meteorological Centre, Mumbai issues weather warning for the next 5 days, for Maharashtra. #Monsoon reached Mumbai today. pic.twitter.com/WUMvigbLqI
— ANI (@ANI) June 9, 2021
मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आले आहे. यासह बहुतांश जिल्ह्यांत पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १२ जूनपर्यंत राज्यात पावसाचा असाच जोर कायम राहणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला जोर आला आहे. आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांत काळे ढग दाटून आल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा जोर अद्यापही कायम असून काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला असून कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा होत आहे. दरम्यान, पहिल्या पावसातच आज मुंबई तुंबली असून महापालिकेने नाले सफाईची कामे शंभर टक्के केली असल्याचा दावा आजच्या पावसाने पार पुसून काढला आहे. मुंबईत आतापर्यंत ४८.९९ एम.एम, पूर्व उपनगरात ६६.९९ एम.एम तर पश्चिम उपनगरात ४८.७८ एम.एम इतक्या पावसाची नोंद झाली आहे.