मुंबई – नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार! कधी, 26 जानेवारीपूर्वी की नंतर?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नवनवीन वाद असे समीकरणच बनले आहे. यावरून विरोधकांनी त्यांना वारंवार हटविण्याची मागणी लावून तर धरली आहेच. शिवाय, भाजपालाही प्रत्येकवेळी त्यांच्या बाजूने सारवासारव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपर्यंत किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांना माघारी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
“During the recent visit of the Hon’ble Prime Minister to Mumbai, I have conveyed to him my desire to be discharged of all political responsibilities and to spend the remainder of my life in reading, writing and other activities,” tweets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/NOOMkoUroZ
— ANI (@ANI) January 23, 2023
‘माय महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून याबाबत दिल्लीतील त्यांचे बॉस केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याकडेही कोश्यारींबाबत काय करायचे, याचा निर्णय विचाराधीन आहे, असेही समजते. सध्या महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांचा नवा वाद नसल्याने हीच योग्य वेळ साधत येत्या आठवड्याभरात राज्यपाल कोश्यारींबाबत केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.