मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसाना शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र, विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. (Relief 177 crore for compensation of unseasonal rains in March)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. ४ मार्च ते ८ मार्च आणि १६ मार्च ते १९ मार्च या कालावधीत राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले.
अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.
महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी
- अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार.
- नाशिक विभाग – ६३ कोटी ९ लाख ७७ हजार.
- पुणे विभाग – ५ कोटी ३७ लाख ७० हजार.
- छत्रपती संभाजी नगर – ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.
- एकूण निधी – १७७ कोटी ८० लाख ६१ हजार.
हेही वाचा – शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या याचिकेबाबत नरेश म्हस्केंकडून खुलासा, म्हणाले…