नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची चाळण झाल्याने गेल्या महिनाभरापासून वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत व्यापारी-उद्योजकांनी टोल न भरण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी महामार्गाची दशा पाहून यावर तातडीने तोडगा काढण्याची सूचना अधिकार्यांना केली होती. याची दखल घेत महामार्गाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
नाशिक-मुंबई हायवेवर वडपे ते ठाणे यादरम्यान वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने नाशिकहून मुंबईत पोहोचण्यासाठी तब्बल चार ते पाच तास लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिककरांसह भिवंडी, कल्याण व ठाणे येथील नागरिक, उद्योग व व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सूचविल्या होत्या. तसेच, मंत्री भुसे यांनी स्वतः महामार्गाच्या दूरवस्थेची पाहणी करून वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याची दखल घेत सुरू झालेले डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, टोलसाठी पैसे मोजूनही वाहनचालकांसह प्रवाशांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता. विशेष म्हणजे नाशिक-मुंबई अंतर कापण्यासाठी प्रवाशांना तब्बल ५ ते ८ तास लागत होते. यात अनेकांची विमानेही सुटली होती.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महामार्गाचे काम सुरू असून, पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणार्या किरकोळ बाबींचा निपटारा केला आहे. कटदेखील बंद केले आहेत. वाहतूक कोंडी होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली आहे. अधिकार्यांना तंबी दिली असून, कुठल्याही प्रकारची कोंडी यापुढे रस्त्यावर दिसणार नाही यासाठी उपाययोजना सुरू आहेत. तसेच, ट्रॅफिक पोलीस व वॉर्डन यांनादेखील सूचना केल्या आहेत. : दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक