प्रत्येक वर्षी सुट्टी टाकून, खाडे करुन मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी जातात. सध्या सुरु असलेल्या कोरोना प्रार्दुभावामुळे एसटी आणि रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे कोकणात जायचे तरी कसे? असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. कोकणात जाणार्या नागरिकांनी एसटी बसेस सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र आतापर्यंत एसटी संबंधीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्घाटनानंतर दुसर्याच दिवशी कोरोनामुळे बंद करावी लागलेली रोरो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे प्रयत्न सागरी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. पुढच्या महिन्यात रोरो बोट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची लालपरी सोडा आता कोकणात जाणार्यांसाठी रोरो बोट अर्थांत जलपरी तयार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणि कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण चाकरमान्यांनी केली होती. त्यावर परिवहण मंत्री यांनी काही दिवसांपुर्वी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारचा नियमाच्या अधिन राहून प्रवासात काही नियम शिथिल करून एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्याचे आश्वासन परिवहण मंत्री अनिल परब यांनी दिले होते. मात्र यासंबंधी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कोकणात जाणारे चाकरमानी संभ्रमात पडले.
आता हे संभ्रमाचे वातावरणात दूर झाले असून रो-रो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे सागरी महामंडळाचे प्रयत्न आहेत. कारण या बोटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. सध्या सार्वजनिक वाहतुकीची सर्वच साधने बंद आहेत. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करने या एकमेव पर्यायाचा जास्त वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबईतून भाऊचा धक्का ते मांडवा पर्यंतच्या रोरो बोटीची सेवा फायदशीर ठरणार आहे. तसेच सेवेचा उपयोग अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे सागरी महामंडळ लवकरच रोरो बोट सुरु करण्यासाठी कंपणीला परवागी देऊ शकते.
नागरिकांनी केली मागणी
नारळी पौर्णिमेनंतर जलवाहतूक सुरु होते. त्यामुळे जलवाहतूकी बरोबरच रोरो बोट सुद्धा सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणार्यांंसाठी या बोटीचा फायदा होईल. रोरो बोट चालविणार्या एस्कॉयर शिपिंग ऍण्ड ट्रेडिंग कंपनीने सुद्धा यासंदर्भात सागरी महामंडळाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे लवकर या बोटीला मान्यता मिळणार आहे. या रोरो बोटीची प्रवासी क्षमता ५०० असून चार चाकी गाड्यांची क्षमता १८० एवढी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. सध्या आम्हाला परवानगी मिळालेली नाही. मात्र रोरो सेवा सुरु करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. – रामा स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ