तालुक्यातील चौक गावातील मुख्य रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची सध्या तरी कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. रस्ता रूंदीकरणाला चौकच्या एका बड्या नेत्याने खो घातल्याची चर्चा आहे.स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले, तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला खेटून असल्याने गावाचा पसारा वाढत आहे. गावातून जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीमुळे पोलिसांसह ग्रामस्थांचीदेखील ङोकेदुखी ठरला आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ आहे. दुकाने, देशी बार, रुग्णालय, हॉटेल यांनी हा रस्ता दुतर्फा गजबजलेला असतो. त्यात भर म्हणून फेरीवाले, टपर्या यांनी रस्ता व्यापला आहे. श्री राम मंदिर ते खंडागळे घरापर्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यातच मंदिरापासून पुढे पाताळगंगा वसाहतीला जाण्यासाठी लोहप रस्ता आहे.
हा वर्दळीचा रस्ता आधीच अरूंद, त्यात रिक्षा तळ आणि फेरीवाले यांचे बस्तान त्यामुळे वाहतूक कोंडी ठरलेली असते. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले अनेकजण आपली वाहने रस्त्यातच उभी करून ठेवत असल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढते. वाहतूक पोलिसांची अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होऊनसुद्धा परिस्थिती बदलत नाही. यावर उपाय म्हणून मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव असून, त्यासाठी निधी देखील उपलब्ध झाला आहे. प्रस्तावित रस्त्याची मोजणीही करण्यात आली. रूंदीकरणात अडथळा ठरणार्या घरांचा, दुकानांचा काही भाग तोडावा लागणार आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मकता दाखवली आहे.
रूंदीकरण बाधित छोट्या व्यावसायिक, टपरी धारकांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. परंतु विजनवासातून परत येत सक्रिय झालेल्या एका स्थानिक ज्येष्ठ नेत्याने रस्ता रूंदीकरणाला विरोध केला आणि काम बारगळले. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची दुकाने तुटत असल्याने विरोध झाल्याची चर्चा चौकमधील तरुण समाज माध्यमावर उघडपणे करीत आहेत. रस्ता रूंद न झाल्यास भविष्यात पायीदेखील चालणे अवघड होणार आहे.