ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले असताना आता राज्यातील ५ जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणूक न घेण्याची मागणी केली आहे. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा भाजपला कळवळा कधीपासून यायला लागला असा सवाल राष्ट्रवादी नेत्या आणि रोहिणी खडसे यांनी केला आहे. तर ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना कळवळा कुठे गेला होता असा सवल रोहिणी खडसेंनी केला आहे.
राज्यातील ५ जिल्ह्यांत पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व जागांवर भाजपकडून ओबीसी उमेदवार देऊन निषेध करु असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल केला आहे. आता गळा काढण्यात अर्थ नाही असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
रोहिणी खडसेंचा रोख कुणाकडं
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जेव्हा भाजपमध्ये होते त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना त्रास दिला. पक्षातच मुस्काटदाबी सुरु झाल्यानं एकनाथ खडसेंचे मानसिक खच्चिकरण करण्यात आलं शेवटी खडसेंनी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जाहीर सभेत देवेंद्र फडणवस यांनी त्रास दिला असल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे नेतृत्व होते यामुळे रोहिणी खडसेंनी फडणवीसांवर तोफ डागली आहे.
तर सर्व जागांवर ओबीसी उमेद्वार देऊ
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुक होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मांडले. तसेच निवडणुक पुढे ढकलण्याची विनंती करण्यासाठीही भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारचा जर जिल्हा परिषद निवडणुक घेण्याचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देऊ, जिंकलो आणि हारलो तर आम्ही बघून घेऊ असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.