‘सैराट’ चित्रपटासारखी अगदी हुबेहुब घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. ‘सैराट’ चित्रपटामध्ये ज्याप्रकारे अल्पवयीन मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात आणि आपल्या गावातून पळून जातात, अगदी तशीच हुबेहुब घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आपल्या गावातून मुंबईला पळून आले. यातील मुलाचे वय हे १७ वर्षे तर मुलीचे वय १४ वर्ष इतके आहे. या दोघांना कल्याण रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने लुबाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना याविषयी शंका आल्यावर त्यांची चौकशी केली आणि त्या दोघांना त्रास देणाऱ्या भामट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीला शोधण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. यातील मुलगा हा १७ वर्षाचा आहे तर मुलगी १४ वर्षाची आहे. २ मार्चला हे दोघीहीजण मुंबईला दाखल झाले. ते दोन्ही एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांनी घरुन ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणली होती. २ मार्चला ते काशी एक्सप्रेस या गाडीतून रात्री साडे आठच्या सुमारास कल्याण स्थानकावर उतरले. त्यांनी पूर्ण रात्र कल्याण स्थानकावरच काढली. त्यानंतर ३ मार्चला ते जेव्हा स्टेशन बाहेर पडले तेव्हा त्यांना एक इसम भेटला. या इसमचे नाव रियाज अतिक चंदू असे होते. त्याने दोघांना धमकावले आणि त्यांच्याकडून ९,१०० रुपये घेतले. याशिवाय, ज्वेलरीचे सामान विकण्यासाठी ४ तारखेला भेटू असे देखील त्याने दोघांना सांगितले. परंतु, त्या दोघांनी ४ मार्चला पठाणकोट एक्सप्रेसने घरी जाण्याचा निर्णय घेतला. ते चंदूची वाट बघत होते. कल्याण स्थानकावर ते सारखे ये-जा करत होते. त्यांची ये-जा पाहूण पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी साफळा रचत कल्याणच्या शिवाजी चौकातून चंदूला अटक केली. यासोबतच दोन्ही अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना फोन लावून त्यासंबंधी माहिती दिल्ली. रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सतना येथील पोलीस चौकीतही फोन केला आणि दोन्ही अल्पवयीन मुलं आपल्या ताब्यात असल्याची माहिती दिली.