घरमहाराष्ट्र'सरकारचा संबंध डोक्याशी कमी...'; सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका

‘सरकारचा संबंध डोक्याशी कमी…’; सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका

Subscribe

भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आजच्या सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका करण्यात आलीय.

भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आजच्या सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका करण्यात आलीय. “चाळीस डोके आणि पन्नास खोके अशा सरकारचाही संबंध डोक्याशी कमी आणि खोक्यांशी जास्त आहे.” असं म्हणत सामनातून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या नशिबी असल्यानं राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही फुटलेत, असं देखील यात म्हटलंय. आता बारावी पेपरफुटीचं प्रकरणही राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार का? असा खोचक सवाल करत ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.

तीन दिवसांपूर्वी झालेला बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच लीक झाला होता. अत्यंत कडेकोट सुरक्षेत पेपर केंद्रांपर्यंत पोहचवले जात असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांसह अनेकांनी शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या पेपरफुटीच्या प्रकरणात सुरुवातीला दोन आणि त्यानंतर पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यापैकी दोन आरोपी खुद्द संस्थाचालक शिक्षक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

- Advertisement -

हे प्रकरण आता ठाकरे गटानेही चांगलंच उचलून धरलंय. ‘पेपर कोणी फोडले?’ अशा शीर्षकाखाली हा आजचा सामनाचा अग्रलेख आहे. या अग्रलेखातून पेपरफुटी प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेण्यात आलाय. कुचकामी सरकार, कोणतेही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री व ढिले पडलेले हतबल प्रशासन सध्या महाराष्ट्राच्या नशिबी असल्याने राज्याचे नशीबही फुटले व पेपरही फुटले. राज्यात सध्या पेपरफुटीचे पेव फुटले आहे. राज्यातील ‘चाळीस डोके आणि पन्नास खोके’ सरकारचाही संबंध डोक्याशी कमी आणि खोक्यांशी जास्त आहे. मात्र हे पन्नास-पन्नास खोके मोजायला गणिताची काय गरज? असे आपल्या शिक्षणमंत्र्यांना वाटत असावे. गणिताचा पेपर फुटण्याचे असे काही ‘कनेक्शन’ आहे का, ते शिक्षणमंत्र्यांनी एकदा जाहीरच करून टाकावे, असं यात लिहिण्यात आलंय.

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपासून दहावी-बारावीपर्यंत सगळय़ाच परीक्षांचा बोजवारा उडाला आहे. ‘लोकसेवा आयोगाचे प्रकरण आपण पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवू,’ असे ‘बुद्धिमान’ विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. तसे बारावी पेपरफुटीचे प्रकरणही ते पुढील निर्णयासाठी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत काय? महाराष्ट्रात एकापाठोपाठ सगळेच पेपर व निकाल फुटताना दिसत आहेत. याआधी स्पर्धा परीक्षांचे, म्हाडाच्या परीक्षांचेही पेपर फुटले. बारावीचा रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर फुटला व पाठोपाठ गणिताचा पेपर फुटला. हे कसले लक्षण मानायचे? केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खासगी क्लास चालकास अटक केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीमागे खासगी क्लासचे चालक आहेत, असे सांगितले जात असले तरी इतकी गोपनीयता, सुरक्षा व्यवस्था ठेवूनही पेपर परीक्षेआधी फुटतात हे धक्कादायक आहे, पण महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून कोणत्याही परीक्षेशिवाय बेकायदेशीरपणे ‘पास’ होण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे”, असं देखील यात म्हटलंय.

- Advertisement -

“निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सर्व निकाल आधीच फुटले आहेत. ”निवडणूक आयोगाचा निकाल काही झाले तरी आमच्याच बाजूने लागणार. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार. सगळे सेटिंग झाले आहे,” असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे निकाल आधीच फुटल्यासारखे आहे. शेवटी निकाल त्याच पद्धतीने लागला. भारतीय जनता पक्षात मोदींपासून स्मृती इराणींपर्यंत प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेवर, पदव्यांवर शंका व प्रश्नचिन्ह आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या डिग्र्या बोगस आहेत व प्रत्यक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे सोंग आणणाऱ्या किरीट सोमय्यांची ‘डॉक्टरेट’ बनावट असल्याचे उघड झाले. त्यांच्या डॉक्टरेटचा प्रबंध व संबंधित कागदपत्रे विद्यापीठाच्या रेकॉर्डवर नाहीत. मुंबईत भाजपशी संबंधित अनेकांच्या ऑक्सफर्ड, केंब्रिजच्या ‘डॉक्टरी’ पदव्या बोगस निघाल्याची प्रकरणे उघड झाली. त्यामुळे अशा सत्ताधाऱयांच्या अमलाखाली ‘परीक्षा’ वगैरे हा फक्त फार्स ठरतो व सध्या महाराष्ट्रात तो जोरात सुरू झाला आहे.”, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांना देखील टार्गेट करण्यात आलंय.

“हजारो मुले, गोरगरीबांच्या घरातील विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात, परीक्षेला जातात व त्याआधीच काही मुलांच्या हाती त्याच परीक्षेचा पेपर आलेला असतो. महाराष्ट्रात ही लागण आतापर्यंत लागली नव्हती, पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्राच्या समाज जीवनात अशी वाळवी लागणे सुरू झाले आहे. रेडाबळी देऊन जे सत्तेवर आले, त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बळी दिला आहे. सरकार चोऱ्यामाऱ्या करून, पैसे वाटून, नियम मोडून आले. त्यामुळे ‘पेपरफुटी’ प्रकरणाचे गांभीर्य त्यांना कळणार नाही. उलट ”मिंधे गटात या, तुमच्या पोराबाळांच्या हाती परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका ठेवतो” अशी ऑफर द्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. पेपरफुटी प्रकरणाचा आता तपास होईल, पण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत तपास पोहोचेल काय? असा सवाल देखील यातून उपस्थित करण्यात आलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -