बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल बुधावरी सकाळी पहाटे जाहीर झाले. चुरशीच्या लढाईत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA ने सत्ता कायम राखली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये राजद पत्र पुढे होता. त्यानंतर NDA ने आघाडी घेतली. मात्र, रात्री उशीरा NDA आणि युवा नेतृत्व तेजस्वी यादव यांच्या नेृत्वातील महागठबंधन यांच्या काँटे की टक्कर पाहायला मिळाली. तेजस्वी यादवने अनुभवी नेत्यांना घाम फोडल्याचे निकालात दिसून आले. यावर शिवसेनेने NDA वर ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून घणाघात केला आहे.
“बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेच होते. मतदानानंतर जे ‘एक्झिट’ पोल वगैरे दाखवण्यात आले त्यानुसार अटीतटीची लढत होईल असे चित्र दिसले. साधारण निकाल तसेच आले आहेत. अटीतटीच्या लढतीत ‘एनडीए’ म्हणजे भाजप-नितीशकुमारांची आघाडी पुढे गेली आहे, पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयु’ची पीछेहाट झाली आहे. हेसुद्धा अपेक्षेप्रमाणेच घडले आहे. बिहारवर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य आले आहे, पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील काय, हा प्रश्न अधांतरी आहे.”
“बिहारच्या निवडणुकीत ‘एनडीए’ने आघाडी घेतलीच आहे, पण तेथील राजकारणात नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली. तेजस्वी यादव हा नवा तरुण दमाचा चेहरा उदयास आला. त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा, नड्डा व संपूर्ण सत्तामंडळाशी एकहाती लढत दिली. तेजस्वी यादवने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर दमदार आव्हान उभे केले. बिहार निवडणुकीत मोदी यांचा करिश्मा कामास आला असे ज्यांना वाटते ते तेजस्वी यादववर अन्याय करीत आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची झाली ती फक्त तेजस्वी यादव यांनी निर्माण केलेल्या तुफानी प्रचार सभांमुळे,” असे शिवसेने म्हटले आहे.
“राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टरवर लालू यादवांचे साधे चित्रही नव्हते. तेजस्वी यादव हाच महागठबंधनचा मुख्य चेहरा होता. तेजस्वीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला व सभेत कमालीचा जिवंतपणा होता. त्यामुळे निकालात तेजस्वीच मुसंडी मारतील हा सगळ्यांचाच अंदाज होता. मतदानानंतर भाजप व जदयुच्या गोटात एक प्रकारे सन्नाटा पसरला होता. लढाई हरत असल्याच्या खात्रीने आलेले हे नैराश्य होते, पण निकालानंतर निराश चेहरे उजळले आहेत. बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो,” असा टोला शिवसेने NDA ला लगावला आहे.
हेही वाचा – बिहारमध्ये NDA चं सरकार; नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ