शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नव्हते असा खुलासा एनसीबीच्या एसआयटीने केलेल्या तपासात झाला आहे. एसआयटीच्या तपासामुळे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी आणि कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्यन खान प्रकरणात एनसीबीने खंडणीखोरी केली असल्याचे उघड झाले आहे. तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप खरा होताना दिसत आहे. भाजपचे नेते एनसीबीचे पंच म्हणून सामील होते. यामुळे भाजपने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनसीबी एसआयटीच्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरील अहवाल ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. SIT ने आर्यन खानकडे ड्रग्स नव्हते व समीर वानखेडे टीमने रेड टाकताना केलेल्या चुका प्रकाशात आणल्या आहेत. यातून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे आरोप योग्य होते आणि NCB तर्फे खंडणीखोरी चालू होती हे स्पष्ट आहे. NCB Rulebook मधील नियमांचे उल्लंघन समोर दिसत असताना अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? या रेडमध्ये भाजपाचा पदाधिकारी पंच म्हणून सामिल होता. महाराष्ट्रातील भाजपा नेते या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होते. भाजपाने जाहीर माफी मागावी. ज्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले त्यांच्यासह वानखेडेच्या पूर्ण टीमवर कारवाई व्हावी. या अगोदर जेवढ्या तक्रारी झाल्या त्या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
BJP office bearer was involved in this raid as a panch. @BJP4Maharashtra leaders were backing these officials. BJP must issue a public apology. Action should be taken against entire team of Wankhede along with officers who backed it. All previous complaints must be investigated
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 2, 2022
एनसीबीची खंडणीखोरी स्पष्ट
तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. एनसीबीच्या टीमने कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज जप्त केले होते. यामध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर हे प्रकरण वादात सापडले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबी एसआयटी गठीत करण्यात आली होती. या टीमच्या चौकशीमध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते. आर्यनच्या चॅटद्वारे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी काही संबंध नसल्याचे अहवालात समोर आले आहे. आर्यनला या प्रकरणात अडकवण्यासाठी बनाव करण्यात आला, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. एसआयटीच्या अहवालामुळे एनसीबीची खंडणीखोरी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.