सचिन वाझे प्रकरणावरती काहीही घडामोडी घडत नाही आहेत. काल शरद पवारांनी देखील स्पष्ट केलं आहे. एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही, असं शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत म्हणाले. चंद्रशेखर यांचं सरकार दोन हवालदारांनी पाडलं होतं. पण तसं काही एका एपीआयमुळे महाराष्ट्र सरकार अस्थिर झालंय, या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. हे सरकार चितपट करणं पुढील साडेतीन वर्षे कोणालाही जमणार नाही, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.
या प्रकरणाचा तपास NIA आणि ATS तपास करत आहे. त्यांच्यावर ते सोडून द्यायचं. केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे तपास करत असेल तर त्यात हस्तक्षेप करणं योग्य नाही. परंतु आमचं तिथल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष आहे आणि असायलाच हवं, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे सचिन वाझेमुळे काय होतंय? काय होणार? कॅबिनेटच्या बैठका त्यांच्यामुळे होत आहेत का? तर असं काही नाही आहे. या फार लहान गोष्टी आहेत.
सचिन वाझे पूर्वाश्रमिचे शिवसैनिक होते हा गुन्हा आहे का? शिवसेना काय बंदी घातलेली संघटना आहे काय? असा सवाल करत प्रत्येक जण हा शिवसैनिक असतोच, असं संजय राऊत म्हणाले. खाते बदल हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. मुख्यमंत्री निर्णय घेतात. पण हे सरकार तीन पक्षाचं असल्यामुळे तीन पक्षाचे नेते बसून निर्णय घेतात.
हेही वाचा – वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत खलबतं; नगराळे, परमबीर सिंह, गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा