द कश्मीर फाईल्सवरून रोज नवनवीन वक्तव्ये समोर येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या अमरावती दौऱ्यात कश्मीर फाईल्सवर विधान केले आहे. कश्मिर फाईल्सच्या निमित्ताने समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याठिकाणी होता. दुर्दैवाने ज्यांचा हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे अशाप्रकारची घोषणा केली याबाबत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली होती. त्यातच विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही धुळ्यातील वक्तव्यामुळे साध्वी सरस्वती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी द कश्मीर फाईल्सच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. साध्वी सरस्वती यांनी तरूणांना तलवार बाळगण्याचे आवाहन केले आहे. दुसरा कश्मिर फाईल्स रोखण्यासाठी तरूणांनी मोबाईल आणि लॅपटॉपएवजी तलवार बाळगावी असे आवाहन त्यांनी तरूणाईला केले आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
धुळ्यात बोलताना त्या म्हणाल्या एक दिवस आपल्यालाही पळवले जाईल. त्यावेळी आपल्यालाही विचारण्यात येईल की हिंदूंनी, ब्राम्हणांनी तलवार का नाही उचलली ? आपल्या हक्कासाठी लढाई का नाही केली? आपण युद्ध का नाही केले ? हीच स्थिती आपलीही होऊ शकते. म्हणूनच मी विनंती करते की, पुन्हा दुसरी कश्मिर फाईल्स बनता कामा नये. तुमच्या धुळ्यातही अशी परिस्थिती उद्भवायला नको. म्हणूनच जर एक लाखांचा मोबाईल खरेदी करत आहात, १ लाखांचा लॅपटॉप खरेदी करत आहात, तर एक हजारांची तलवारही खरेदी करा.
हिंदू समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न
काश्मीरमध्ये हिंदू समाजाचे लोक आहेत त्यांना काश्मीर पंडीत बोलतात. एक काळ येऊन गेला दहशतवादी शक्तीनी पंडितांवर हल्ले केले त्यामुळे काश्मीर सोडून त्यांना जावे लागले. त्यांना जावं लागल्यानंतर अलीकडे एक सिनेमा एका गृहस्थाने काढला. त्या सिनेमात हिंदूवर कसे अत्याचार झाले हे दाखवण्यात आले. एखादेवेळी लहान समाज संकटात असतो त्यावेळी त्यांच्यावर मोठा समाज हल्ला करतो आणि काश्मीरमध्ये मोठा समाज मुस्लिम आहे. हे जेव्हा दाखवलं जातं त्यावेळी देशातील हिंदू समाजामध्ये एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. ती अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याठिकाणी होता. दुर्दैवाने ज्यांचा हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे अशाप्रकारची घोषणा केली याबाबत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली.