नाशिक – साहित्यिकांची मांदियाळी आणि सारस्वतांचा मेळा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्यावर अध्यक्षांपासून ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीची अनिश्चितता आणि मानापमान नाट्याचं सावट होतं. विशेष म्हणजे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करूनही महापौर सतीश कुलकर्णी या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्याच्या निर्णयापासूनच हे संमेलन कार्यक्रम स्थळ, संमेलनाध्यक्ष, कोरोनामुळे पुढे ढकललं जाणं, कार्यक्रमाच्या नियोजनातील गोंधळ आणि कार्यक्रम पत्रिकेतील व्याकरणाच्या चूका अशा कारणांमुळे चर्चेत राहिलंय. अगदी उद्घाटनाच्या आदल्यादिवसापर्यंत नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे संमेलनातल्या कार्यक्रमांच्या फेरनियोजनाची रंगीत तालीम सुरू होती. विशेषतः संमेलनाचे अध्यक्ष नारळीकरांच्या उपस्थितीबाबत आदल्या दिवसापर्यंत अनिश्चितता होती. शेवटी ते आलेच नाहीत. दुसरीकडे भाजपचे महापौर सतीश कुलकर्णी आणि खासदार डॉ. भारती पवार हेदेखील अनुपस्थित राहिल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला की काय, अशी चर्चा होती. उद््घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे दोघंही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहिले.