नाशिक : मराठी साहित्यविश्वात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी, संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. आयोजकांनी साहित्य महामडळांच्या अध्यक्षांना कार्यक्रमपत्रिका दाखवली पण झाले भलतेच. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका आयोजक घेऊन येतील असे महामंडळाच्या अध्यक्षांना वाटले होते. पण कार्यक्रमपत्रिका नीटनेटके नसल्याने व व्याकरणदृष्ठ्या अशुद्ध असल्याचे सांगत नाशिकमध्येच अनुभवी मुद्रितशोधकाकडून कार्यक्रमपत्रिका सूचनेनुसार अंतिम करावी, असे आता अध्यक्षांनी सांगितले आहे.
साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यासाठी संमेलनाचे कार्यवाह प्रा. शंकर बोर्हाडे आणि संजय करंजकर यांनी औरंगाबाद येथे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची बुधवारी (दि.१७) भेट घेत कार्यक्रमपत्रिका दाखवली. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका न आणल्याने आणि सांगितलेली नावे परिसंवाद व कवीकट्टयामध्ये नावे नसल्याने ठाले-पाटील यांनी विचारणा केली. कार्यक्रमपत्रिका बारकाईने अनुभवी मुद्रितशोधक तपासून घ्यावी व कोणतीही नावे सुटू देऊ नका, असे ठाले-पाटील यांनी प्रा. बोर्हाडे व करंजकर यांना सांगितले आहे. त्यानंतर आयोजकांनी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची भेट घेत निमंत्रण दिले. त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून, ते समारोप सत्रासह तीन दिवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी चपळगावकर यांनी प्रा. बोराडे, करंजकर व समीक्षक ऋषिकेश कांबळे यांच्यासमवेत नाशिकमधील आठवणींना उजाळा दिला.
आयोजकांनी दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेतील शुद्धलेखन तपासत दुरुस्ती करुन दिली. परिसंवादासाठी अध्यक्ष नावे होती पण इतर ५ नावे नव्हती. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका करुन नाशिकमध्ये अनुभवी मुद्रितशोधकाकडून कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यास आयोजकांना सांगितले आहे.
– कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ