पंचवटी : लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी नाशिकमधील हिंदू संघटना सोमवार (दि.२८) रोजी रस्त्यावर उतरणार असून शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आफताबने दिल्ली येथे श्रध्दा वालाकर हिचे ३५ तुकडे करत निघृणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारक करीत आहे त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२५) वरद लक्ष्मी लॉन्स औरंगाबादरोड येथे सायंकाळी ६ वाजता बैठक होणार आहे. तर, सोमवारी (दि.२८) बी.डी. भालेकर मैदानावरुन मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मागण्या
लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागु करण्यात यावा. श्रद्धा वालकर ह्या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कठोर कारवाई करण्यात यावी.
असे आहे नियोजन
मोर्चाच्या अग्रभागी हाती भगवा ध्वज घेऊन युवती असतील. त्यानंतर महिला, साधु महंत त्यानंतर विविध शिवजन्मोत्सव समिती, हिंदुत्ववादी संघटनांचे धर्मसेवक, नाशिक शहरातील सर्व मंडळांचे आणि पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वात शेवटी सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनीधी असणार आहेत. मोर्चाचे निवेदन आणि नेतृत्व महिला वर्गाकडे असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.