कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले जातेय. अशातच राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय. मात्र राज्यात असे काही भाग आहेत जिथे वेगवेगळ्या गैरसमजांमुळे लोकं कोरोनाविरोधी लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या भागांमध्ये नागरिकांच्या मनात कोरोनाविरोधी लसीबद्दल अनेक शंका आहेत. त्यामुळे मुस्लील बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. यासाठी राज्य सरकारने एक नवा प्लॅन आखला असून ज्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची मदत घेतली जाणार आहे. सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुल परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती करुन तेथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकार विचार आहे.
Vaccine hesitancy seen in Muslim-dominated areas, govt will rope in actor Salman Khan to promote inoculation: Maharashtra Public Health Minister Rajesh Tope
— Press Trust of India (@PTI_News) November 16, 2021
यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी घोषणा केली. “राज्यातील अनेक भागात लसीकरणाचा वेग व टक्का वाढवण्यासाठी, विशेष करून मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यामध्ये सोमवारी ते माध्यमांशी बोलत होते.
“मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. त्यामुळे अशा भागांतील मुस्लिम लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ आणि ‘घर घर दस्तक’ या उपक्रमांद्वारे घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहोत. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत. धर्मगुरु आणि कलाकारांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं मुस्लिम बांधव ऐकतील” असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय.
“विशेषत: सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे. याशिवाय सलमानप्रमाणे मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अभिनेत्यांचेही लसीकरणाबाबतचे व्हिडिओ तयार केले जातील” असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
“तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले की, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय. मात्र रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, तसेच कोरोनसंदर्भातील नियम पाळावे” असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे.