बिना मुख्यमंत्र्याची शॅडो कॅबिनेट अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आल्यानंतर मनसेकडूनही ट्विटरवरून आता सडेतोड टीका करण्यात आली आहे. मनसेच्या संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोघांनाही या शॅडो कॅबिनेटवरील अग्रलेखाला ट्विटरवरून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. एकही महत्वाच खात नसलेले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री पद देऊन वेळ अपव्यय कशासाठी असा विचार राज साहेबांनी केला असावा या शब्दात मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री पद अजित दादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात.एकही महत्वाच खात नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या श्याडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे श्याडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 11, 2020
सावलीवर खर्च केल्याबद्दल शॅडो संपादकांचे आभार असे ट्विट मनसेच्या अमेय खोपकर यांनी केले आहे. नुसत्या शॅडो कॅबिनेटच्या घोषणेने राऊतांची तंतरली. हा खेळ सावल्यांचा आता कुठे सुरू झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात मोठी तिची सावली असा अग्रलेख लिहायला लागू नये अस काम महाखिचडीने कराव अशा सदिच्छाही खोपकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिल्या आहेत.
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 11, 2020
महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विऱोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत विऱोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही असा उल्लेख करतानाच आजच्या सामनाच्या अग्रलेखात मनसेच्या माध्यमातून भाजपलाही टार्गेट करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शॅडोची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करून नका. हे बरे झाले. पुन्हा ‘शॅडो’ वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिक रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसल अशी टीका आजच्या सामनाच्या संपादकीयच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
भाजप विऱोधी पक्ष झाला तरी अद्यापही सत्ताधाऱी असल्याच्या तोऱ्यात वागत आहे. हे जरा गमतीचे वाटते. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळावर नजर ठेवण्यासाठी एक शॅडो कॅबिनेट एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे शॅडो मंत्रीमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले तर अभिनंदन करावे असे सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे शॅडो कॅबिनेट कुणी करावे याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. तिथे भाजप हा एक विरोधी पक्ष आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने शॅडो मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो की काय ते बनवले.
महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याची विरोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्याती विरोधी पक्ष आपल्या बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. अनुभव माणसाला शहाणपण शिकवतो. तो असा कामास येतो. शॅडो मंत्रिमंडळ बनविण्यासाठी त्या संख्येने आमदार किंवा खासदार निवडून आणावे लागतात तसे दिसत नाही. पुन्हा शॅडोवाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामे आहे. शॅडो मुख्यमंत्री हा अधिकृत विरोधी पक्षनेता असतो. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसले.