घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, संभाजीराजेंचा थेट आरोप

उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, संभाजीराजेंचा थेट आरोप

Subscribe

माझ्याकडे राज्यसभेसाठी अर्ज भरता येईल एवढ्या आमदारांच्या अर्जावर सह्या आहेत. निवडणूक जिंकता येईल एवढ्या आमदारांचा पाठिंबाही होता, पण सगळ्या पक्षांच्या आमदारांवर पाठिंबा देऊ नये म्हणून दबाव होता, असा दावा त्यांनी केला.

शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता. आमच्यात उमेदवारीसह सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते, मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरविला, असा थेट आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी केला. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुरेशा आमदारांच्या सह्या माझ्याकडे आहेत आणि निवडून येण्याइतपत पाठबळही आहे, मात्र निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली.

येत्या १० जून रोजी होऊ घातलेली राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती. त्यासाठी सर्व पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेने संभाजीराजेंना पक्षाची उमेदवारी देऊ केली होती, मात्र संभाजीराजे यांनी ती नाकारल्याने त्यांचा राज्यसभा लढविण्याचा मार्ग बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर संताप व्यक्त केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी शब्द का फिरवला आणि ते असे का वागले या गोष्टीचे मला प्रचंड वाईट वाटत आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले हे मला जाहीर करायचे नव्हते, पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर किंवा पुतळ्याजवळ यायला तयार आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी शपथेवर सांगावे की मी खोटे बोलतोय म्हणून, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी ठाकरे यांना आव्हान दिले.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रिपदाचा मान राखून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. उद्धव ठाकरे यांनी मला छत्रपती आमच्यासोबत हवेत, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हाही मी अपक्ष म्हणून लढणार यावर ठाम होतो,असे संभाजीराजे यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून लढायची तयारी दर्शविली, पण उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ते शक्य होणार नाही. त्याऐवजी तुम्ही शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार व्हा, असे त्यांनी मला सांगितले. काही दिवस उलटल्यानंतर शिवसेनेच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यानंतर शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या घरी आमची बैठक झाली. त्या बैठकीत एक मसुदा तयार करण्यात आला. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि माझ्या सूचनांचा समावेश होता. तो मसुदा आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. यानंतर पुन्हा एकदा बैठक झाली. तेव्हा एक मंत्री, त्यांचे स्नेही आणि शिवसेनेचा एक खासदार मला भेटायला आले. शिवसेना मंत्र्याच्या स्नेह्याने मला पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करण्याविषयी विचारले. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे प्रवेश करण्यास नकार दिला, असा दावा संभाजीराजे यांनी केला.

त्यानंतर हा विषय तिथेच थांबवून राज्यसभेच्या उमेदवारीबाबतच्या मसुद्याचे वाचन करून काही बदल केले. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर मी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी कोल्हापूरकडे निघालो तर अचानक प्रसारमाध्यमांवर संभाजीराजे वर्षा बंगल्यावर येऊन शिवबंधन बांधणार, उद्या प्रवेश होणार, अशा बातम्या झळकू लागल्या. त्या बातम्या पाहून मला धक्का बसला. यावर मी शिवसेनेच्या मंत्र्याला फोन करून विचारणा केली, पण ते याबद्दल काहीच बोलले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नंतर माझा फोनच उचलला नाही. यानंतर कोल्हापुरातील संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. झाल्या प्रकाराबद्दल मला इतकेच वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मला दिलेला शब्द मोडला, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली.

ही माघार नाही!
माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. उद्धव ठाकरेंनी ती दिलीच होती, पण माझ्यासाठी माझी जनता महत्त्वाची आहे. माझा विचार महत्त्वाचा आहे. स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती कोणासमोर झुकून खासदारकी घेणार नाही ही माझी भूमिका आहे. उलट खासदारकी नाकारून त्यांनी मला मोकळे केले आहे. आता विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी आणि स्वराज्य जमविण्यासाठी मी सज्ज झालो आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

सगळ्या पक्षांचा आमदारांवर दबाव
माझ्याकडे राज्यसभेसाठी अर्ज भरता येईल एवढ्या आमदारांच्या अर्जावर सह्या आहेत. निवडणूक जिंकता येईल एवढ्या आमदारांचा पाठिंबाही होता, पण सगळ्या पक्षांच्या आमदारांवर पाठिंबा देऊ नये म्हणून दबाव होता, असा दावा त्यांनी केला. अनेक आमदारांनी अनुमोदन म्हणून मला सह्या दिल्या, पण नाव उघड करू नये, अशी त्या आमदारांची इच्छा आहे, मात्र ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, त्यांच्यासाठी मी ठामपणे उभा राहीन. त्यांनी कधीही हाक मारावी, छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर राहणार, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी आमदारांचे आभार मानले. त्याचवेळी मी आता लढलो तर घोडेबाजार सुरू होईल आणि ते बरोबर होणार नाही, म्हणून मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

तुम्ही शिवसेनेत जाण्याचे का टाळले? शिवसेना तुम्हाला अस्पृश्य आहे का, असा सवाल पत्रकारांनी त्यांना केला. त्यावर अस्पृश्य हा शब्द शाहू महाराजांनीच घालवला आहे. हा शब्द चुकीचा आहे. शिवसेनेचा जसा अजेंडा आहे तसा माझाही आहे. त्यामुळे मला कोणत्याही पक्षात जायचे नव्हते, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

सहाव्या जागेचा विषय आता संपला – संजय राऊत
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेवरील जागेचा विषय आमच्यासाठी आता संपला आहे. शिवसेना आपल्या धोरणानुसार वागली आहे. आम्ही आमची सहावी जागा संभाजीराजेंना देऊ केली होती. मतांची व्यवस्था देऊ केली होती. संभाजीराजे छत्रपतींना आम्ही राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रस्ताव दिला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. हे मी दोन दिवसांपूर्वीही सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेचा निर्णय आमच्यासाठी संपला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला प्रेम, आदर, आस्था आहे. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -