राज्यातील नगरविकास खात्यात बदल्यांचा सावळागोंधळ सुरु असून १५ दिवसांपूर्वी केलेल्या आयुक्तांच्या पुन्हा अचानक उचलबांगड्या करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी या तिन्ही महापालिकांमध्ये आयुक्तपदी नियुक्त केले आहेत. विशेष म्हणजे मीरा–भाईंदर व उल्हासनगर या दोन पालिका आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांपूर्वीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र आजच्या बदल्यांमुळे एकनाथ शिंदे यांनी बसवलेले आयुक्त अजितदादांनी उठवल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने आज नवी मुंबई, मीरा–भाईंदर तसेच उल्हासनगर या तीन महापालिका आयुक्तांची नव्याने नियुक्ती केली. त्यामध्ये नवी मुंबईच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत नवी मुंबईकरांमध्ये कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात नवी मुंबईत काही पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हट्टामुळे त्यावेळी अण्णासाहेब मिसाळ यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदावर नियुक्ती केली होती. मिसाळ यांचे मुंडे परिवाराशी असलेले निकटचे संबंध सर्वश्रुत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मिसाळ यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यांशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही आज अखेर त्यांना नवी मुंबईतून जावे लागले. नवे आयुक्त बांगर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते.
मीरा–भाईंदरमध्ये सरनाईकांचा विरोध डांगेंना भोवला?
मीरा-भाईंदर पालिका आयुक्तपदी चंद्रकांत डांगे यांची २ महिन्यांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध चंद्रकांत डांगेना भोवला असल्याची चर्चा मीरा-भाईंदरमध्ये सुरु आहे. त्यामुळे नगरविकास खाते जरी ठाण्याचाच एकनाथ शिंदे यांच्यांकडे असले ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाहीला हलकासा धक्का दिल्याचे बोलले जाते. मातोश्रीने लक्ष घातल्यामुळेच दोन महिन्यात चंद्रकांत डांगेंची पालिका आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. डॉ. विजय राठोड यांची मीरा-भाईंदर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये समीर उन्हाळेंना १५ दिवसात धक्का
उल्हासनगर पालिका आयुक्तपदी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची अवघ्या १५ दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली होती. त्यांनी यापूर्वीही उल्हासनगरात आयुक्त म्हणून काम केले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना उल्हासनगरात आणण्यात आल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी असलेली सलगी उन्हाळेंच्या पथ्यावर पडली होती. उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या बाबतीतही अजित दादांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच दिलेले शिंदेंच्या मर्जीतील पालिका आयुक्त राज्य सरकारने पुन्हा बदलले आहेत.
त्यामुळे राज्य सरकारच्या या बदलाबदली नाट्यात या शहरांमधील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आता नव्याने आलेले नव्या दम्याचे पालिका आयुक्त रोखणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा –
व्याघ्र प्रकल्पाजवळील खाणीच्या लिलावाला आदित्य ठाकरेंचा विरोध