मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सातत्याने वानखेडेंचे जात प्रमाण बनावट असल्याचे आरोप करत आहेत. तसेच जात प्रमाणपत्र आणि सर्व कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडे मंत्री नबाव मलिक यांनी वानखेडेंच्या जात प्रमाण पत्राविरोधात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आता मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन करुन तपास सुरु केला आहे. यानंतर आणखी दोन जणांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता मुंबई विभागाचे कास्ट सर्टिफिकेट स्क्रूटनी कमिटीकडून याचा तपास केला जाणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र सराकारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी कोणतीही परवानगी दिली नाही, परंतु दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवरून आता वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची स्क्रूटनी कमिटीमार्फत तपासणी होणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
एबीपी माझाच्या बातमीनुसार, वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राविरोधात स्क्रूटनी कमिटी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहे. ज्यातील एका तक्रारदाराचे नाव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे आणि दुसऱ्या तक्रारदाराचे नाव भीम आर्मीचे अशोक कांबळे असे आहे.
या तक्रारीत समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे आहे. जे मिळण्यासाठी त्यांनी मूळ कागदपत्रांमध्ये छेडछाड केली आहे, जेणे करुन त्यांना एससी जातीमध्ये नोकरी मिळू शकेल, असे आरोप करण्यात आले आहे. या कमिटीमार्फत दोन्ही तक्रारदारांना ३० नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत.
या तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना कमिटीसमोर हजर रहावं लागणार आहे. यानंतर समीर वानखेडेंचे सर्व कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया सुरु होईल. तक्रारदारांकडून या कमिटीसमोर समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, निकाहनामा हे पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहे. या पुराव्यांच्या आधारे समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत कमिटीला तपास करायचा असतो. या कालावधीत तपास न झाल्यास कमिटी वेळ मागून घेऊ शकते. दरम्यान तपासाअंती जात प्रमाणपत्र किंवा दस्तावेज खोटे असल्याचे आढळले तर अशावेळी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकारी कमिटीला आहेत.