समद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केल्यानंतर वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात होती. या अपघातांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी आता प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादेसह इतर नियम लागू केले आहेत. आता समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना कार चालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अतिवापरने घासलेल्या टायरसह समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरटीओने तीन वाहनांवर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. Samruddhi highway accident precaution RTO Examine tyres of Vehicles
आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी Tred depth Analyzer च्या सहाय्याने टायरची तपासणी सुरु आहे. यातील तीन वाहनांचे टायर जास्त घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावर आढळून आले. या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
… तर महामार्गावरुन पुढे जाता येणार नाही
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार एन्ट्री पाॅईंटवर दिवसभरात 208 गाड्यांची तपासणी करण्यात आली. यातील 22 गाड्यांचे टायर घासलेले आणि जीर्ण झालेले आढळल्याने या गाड्यांना माघारी पाठवण्यात आले. जास्त करुन अपघात हे टायर फुटल्याने झाल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे गाड्यांचे टायर चांगले नसतील, त्या गाड्यांना या महामार्गावरुन पुढे सोडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा: बाबरी पाडणारे शिवसैनिक नव्हे तर हिंदू; बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर- चंद्रकांत पाटील )
महामार्गावर वेगमर्यादा निश्चित
महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना वाढत आहेत. याच कारणामुळे आता स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा आता ताशी 120 किलोमीटर प्रतिसात निश्चित करण्यात आली आहे.
11 डिसेंबर 2022 पासून शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. तेव्हापासून या मार्गाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंज जवळ काही तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा पुढे आले होते. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत.