शिंदे गट-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदार संदिपान भूमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. परंतु त्यांची पदावर वर्णी लागताच भूमरे यांनी एक मोठा दावा केला आहे.
औरंगाबादमध्ये पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे येथे चांगलेच वातावरण तापले आहे. येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरून औरंगाबाद येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता. परंतु त्यानंतर आता भूमरे यांनीदेखील वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे.
येत्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटात मोठी इन्कमिंग होणार असल्याचा दावा देखील भूमरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक पुढारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे.