नवनीत राणा यांनी आपल्याला पोलीस ठाण्यात मूलभूत गोष्टींसाठी कशा पद्धतीने टाळले याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनीही या प्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश दिले. पण मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या ट्विटमुळे आज संपूर्ण आरोप प्रत्यारोपांमधील एक बाजू समोर आली आहे. पण राणा दांपत्याच्यावतीनेही संजय पांडेंच्या दाव्याला प्रत्यूत्तर देणारा व्हिडिओ समोर आला आहे. राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी हा व्हिडिओ शेअऱ केला आहे. राणा दांपत्यांच्या विनंतीनंतरच हा व्हिडिओ शेअर करत असल्याचे त्यांनी म्हटले.
.. @navneetravirana‘s Lawyer Adv Rizwan Merchant’s reply to Mumbai CP @sanjayp_1 over the video showing they are being served tea.
Listen in 👇 pic.twitter.com/thclQ3flEK— Sunaina Holey (@SunainaHoley) April 26, 2022
राणा दांपत्याला अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये ते चहा पितानाचा व्हिडिओ संजय पांडे यांनी शेअर केला आहे. रिझवान मर्चंट यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये चहाचासाठी पोलिसांनी विचारले याबाबत काहीही म्हणायचे नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र आपल्याला या व्हिडिओबाबत काहीही म्हणण नसल्याचे स्पष्ट केले आहे. राणा दांपत्य हे १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांनाही सांताक्रूझ येथील पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. नवनीत राणा यांनी मूलभूत सुविधांमध्ये पाणी आणि शौचालय वापरायला न मिळणे याबाबतची तक्रार ही लोकसभा अध्यक्षांना केली आहे. ही तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या अनुषंगाने असल्याचे रिझवान मर्चंट यांनी स्पष्ट केले आहे.
नवनीत राणांची तक्रार काय ?
“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला. “मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणात माहिती मागवली. तसेच महाविकास आघाडी सरकारला अहवालही सादर करण्यास सांगितले आहे. राज्याचा गृह विभाग या प्रकरणात अहवाल सुपुर्द करणार आहे. खुद्द गृहमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.