राज्यसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांपैकी भाजपाने सातवी जागा भरल्याने घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न
संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,राज्यसभेच्या सहा जागांपैकी सातवी जागा ज्याने भरली आहे. त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. खरं म्हणजे त्यांच्याकडे इतकी मतं नाहीयेत. कारण त्यांच्याकडे मतं जर असली असती तर त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली असती. परंतु आधी संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना सहाव्या जागेसाठी भाजपाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यानंतर आता त्यांनी दूध आणि एका साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपचे दोन्ही उमेदवार बाहेरचे…
मला एक आश्चर्य वाटतंय की, भाजपचे दोन्ही राज्यसभेतील उमेदवार हे भाजपचे नसून ते दोन्ही बाहेरचे आहेत. जे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आहेत त्यांना डावलण्यात आलं. परंतु जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि ते फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी असल्याचं दिसून आलंय. भारतीय जनता पक्ष हा जुना पक्ष राहिलेला नाहीये. अशाच लोकांनी हा पक्ष सहज ताब्यात घेतला आहे. परंतु शिवसेनेमध्ये आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे, असं राऊत म्हणाले.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तसेच त्याचं नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे कोणी हा प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहीजे, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : Jammu kashmir : अवंतीपोरामध्ये चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान ; AK-47 जप्त