नवी दिल्लीः अंमली पदार्थ विरोधी पथकच्या NCB अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मग ED,CBI,IT अधिकाऱ्यांचं काय?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन केला आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप करत सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्वीट केलं आहे. भारतातील सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेने २५ कोटींची खंडणी मागितली तर विचार करा सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल ज्यांच्याकडे अशाप्रकारे खंडणी मागितली जात असेल. हा निव्वळ आर्थिक दहशतवाद आहे, असं ज्येष्ठ विधिज्ञ सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. यावर खासदार राऊत यांनी re-tweet केलं आहे. What about ED CBI and IT? असं re-tweet खासदार राऊत यांनी केलं आहे.
What about ED CBI and IT? https://t.co/PRvKNzSiE1
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
खासदार राऊत यांच्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. NCB चा अधिकारी असं करु शकतो तर ED CBI and IT च्या अधिकाऱ्यांचं काय?, या खासदार राऊत यांच्या प्रश्नाने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातून आर्यन खानची निर्दोष मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरूखकडे 25 कोटींची मागणी केली होती. पण त्यानंतर मात्र ही रक्कम 25 वरून 18 कोटींवर निश्चित करण्यात आली. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. तसेच या प्रकरणात मध्यस्थी म्हणून के व्ही गोसावी आणि त्याचा सहकारी सॅनविले डिसोझा यांना ठेवण्यात आले होते. तसेच त्यावेळी टोकन म्हणून 50 लाख रुपये देखील घेण्यात आले होते.
समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून के.व्ही.गोवासी याने आर्यन खानला एनसीबी अधिकारी म्हणून कार्यालयात ओढत नेले आणि त्याला धमकावले, त्याच्यासोबत सेल्फी काढला. समीर वानखेडे यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबाबत देखील नीट सांगता आलेले नाही. समीर वानखेडे यांचा एका व्यक्तीसह महागड्या घड्याळांच्या खरेदी-विक्रीत सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे. याबाबत सुद्धा त्यांनी विभागाला कोणतीही माहिती दिलेली नाही.
या अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या विसरून आरोपींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून २९ ठिकाणी छापे टाकले. तर या प्रकरणात आता 18 मे रोजी वानखेडे यांना दिल्लीतील सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.