नवी दिल्लीः भाजप बदला घेण्याचे राजकारण करत आहे, असा निशाणा खासदार संजय रा्ऊत यांनी बुधवारी मोदी सरकारवर साधला. मी मुख्यमंत्री असताना मला कशा प्रकारे त्रास दिला गेला हे मी सांगत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना सांगितले आहे, याचा अर्थ ते बदला घेत आहेत का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी मोदी सरकार व भाजपवर टीका केली.
खासदार राऊत म्हणाले, बदला घेण्याचे राजकारण तर सुरुच आहे. पण ते बदला कोणाचा घेत आहेत. कोणासाठी घेत आहेत. बदला घेण्याच्या आडून पंतप्रधान मोदी अदानीला का वाचवत आहेत. बदला घेण्यासाठी ते अदानीच्या मागे ठामपणे उभे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे की, अदानी तर चेहरा आहेत. खरा पैसा तर मोदी यांचाच आहे. हे सत्य आहे. अदानीबाबत प्रश्न विचारले म्हणून राहुल गांधी यांची खासदार की रद्द करण्यात आली. मात्र आम्ही प्रश्न विचारतच राहणार आहोत.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे आम्ही विरोधकांच्या बैठकीला गेलो नव्हतो. पण आमचे राहुल गांधी यांच्याशी बोलणे सुरु आहे. आम्ही सर्व विरोधक एकत्रच आहोत. केंद्र आणि राज्यात विरोधकांमध्ये काहीच दुरावा नाही. मोदी सरकार विरोधकांना घाबरले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊतांनी उपस्थित केलेले मुद्दे
गौतम अदानी हे महात्मा आहेत की संत आहेत?
संसदेत आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत, त्यावर मोदी का शांत आहे?
तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक कोण आहेत, हेही जरा पाहा?
महाराष्ट्रातील सरकार कोणत्या भ्रष्टाचाराच्या आधारावर स्थापन झाले, याची चौकशी करणार का?
दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी कोण पैसा देत आहे, पैशांचा पाऊस सुरु आहे.
तेलंगणामध्ये सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कोण करत आहे.
फक्त विरोधकांविरोधातच ईडी, सीबीआय काम का करत आहे.
केंद्र सरकारच्या मनात जनतेच्या मनात रोष आहे. जे इस्त्रायलमध्ये झालं तेच भारतातही होणार आहे.