मालेगाव – उद्धव ठाकरे यांची मालेगाव मधील सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे. रेकॉर्ड ब्रेक शब्दही कमी पडतील अशी ही सभा होईल, असा विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. उर्दू भाषेवर देशात बंदी नाही. त्यामुळे उर्दू भाषेत बॅनर लागले त्यात काही नवल नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या सभेला सर्व जाती-धर्मातील लोक येतील, महाराष्ट्राला दिशा देणारी ही सभा राहिल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांच्या हुकूमशाहीविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे, ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची आजची मालेगावमधील सभा का आहे महत्वाची? वाचा..
मालेगावमध्ये शिवसेनेच्या सभेचे उर्दू बॅनर लागले आहे. यावरुन विरोधकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती आता शिवसेना नाही तर, ‘अली सेना’ झाली असल्याची टीका केली आहे. यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, देशात कोणत्याही भाषेवर अजून बंदी आलेली नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या सभेला येत आहेत, यामुळे ते (शिंदे-फडणवीस) अस्वस्थ आहेत. आम्ही सर्व समाजाच्या लोकांना निमंत्रित केले आहे.
प्रसिद्ध गीतकार आणि माजी खासदार जावेद अख्तर यांचे नुकेतच कौतूक झाले आहे, असे सांगत राऊत म्हणाले, जावेद अख्तर पाकिस्तानात जाऊन जे बोलले ते उर्दूच होते. ते तुम्हाला चालते. आपण सर्व ज्यांचा सन्मान करतो, आदर करतो ते गुलजार आजही उर्दूतूनच लिहितात, अशीही आठवण संजय राऊत यांनी विरोधकांना करुन दिली. उर्दू भाषेवर देशात बंदी नाही.खोक्यावाल्यांचे आयटी सेल हे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करत आहे, असाही आरोप राऊत यांनी केला.