मुंबईः उद्धव ठाकरे हे पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील, असं सुप्रिया सुळेंचंच म्हणणं आहे. सोनिया गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत, असंही शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणालेत. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सगळेच जण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर पलटवार केलाय.
राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजाराचा प्रयत्न
राज्यसभेच्या सहा जागांपैकी सातव्या जागेवर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे, असं दिसतंय. खरं म्हणजे त्यांच्याकडे इतकी मतं नाहीत. कारण त्यांच्याकडे मतं जर असली असती तर त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली असती. परंतु आधी संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना सहाव्या जागेसाठी भाजपाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यानंतर आता त्यांनी दूध आणि एका साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मला एक आश्चर्य वाटतंय की, भाजपचे दोन्ही राज्यसभेतील उमेदवार हे भाजपचे नसून ते दोन्ही बाहेरचे आहेत. जे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आहेत त्यांना डावलण्यात आलं. परंतु जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि ते फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी असल्याचं दिसून आलंय. भारतीय जनता पक्ष हा जुना पक्ष राहिलेला नाहीये. अशाच लोकांनी हा पक्ष सहज ताब्यात घेतला आहे. परंतु शिवसेनेमध्ये आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलं आहे.
हेही वाचाः Sanjay Raut : राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप