राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळीच केंद्रीय सत्तेमुळेच परमबीर सिंह यांना देशातून पळवून लावल्याचा आरोप त्यांनी केला. देशमुखांवरील कारवाई ही राजकीय षडयंत्राचा भाग आहे. आमच्या नेत्यांनी आम्हाला बायका मुलांवरून राजकारण करायला शिकवले नाही. बायका मुलांवर आरोप करायची आमची संस्कृती नाही. दिवाळी होऊद्या बॉम्ब फोडणाऱ्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. पण जे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे भाजपचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले नाही, तसेच जे लोक भाजपच्या आमिषाला बळी पडत नाही, अशांना त्रास दिला जातोय असाही गंभीर आरोप राऊत यांनी केला. अनिल देशमुख यांना ईडीकडून झालेल्या अटकेबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख हे न्यायालयीन लढाई लढत होते, ही लढाई अजुनही संपलेली नाही. अनिल देशमुख यांना झालेली अटक ही कायद्याला धरून झालेली नाही आणि त्यापेक्षाही नीतीमत्तेला धरून नाही. जे आरोप करणारे लोक आहेत, ते आरोप करून पळून गेले नाहीत, त्यांना पळवून लावले आहे. कोणी देशाबाहेर पळून जातो, तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. पोलिस महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा देश सोडून जातो, तेव्हा संपूर्ण पाळबळ हे केंद्रीय सत्तेचे असल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याने आरोप करून तो पळून गेला, पण त्या आरोपावर केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करायला सुरूवात केली आहे. ईडीच्या पहिल्याच भेटीत अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. मला वाटत हे सगळ ठरवून चाललेले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास द्यायचा, बदनामी करायची, चिखलफेक करायची असेच प्रकार सुरू आहेत.
अजित पवारांच्या मालमत्तेशी संबंधीत काही धाडी पडल्या आहेत, काही प्रॉपर्टी जप्त झाल्या आहेत. भाजपचे लोक हे जंगलात राहतात का ? त्यांच्या काहीच गैरमार्गाने जमा केलेल्या मालमत्ता नाहीत का ? काही जणांची माहिती ही ईडीला दिलेली आहे. पण कोणावरच कारवाई झालेली नाही. त्यांचे कुटूंब, त्यांची बायका, मुले मग आमचे काय रस्त्यावर आहेत का ? असाही सवाल त्यांनी केला. हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे, ते उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चांगल वातावरण होते. पण हे बिघडवण्यात आले आहे. त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे. आता भाजपचे लोक टणाटणा उड्या मारत आहेत, पण त्यांच्यावर तोंड लपवायची वेळ येईल. काही लोक म्हणताहेत, दिवाळीनंतर अस करू, तस करू, यांना घरातून नाही. पण यांना तोंड बाथरूममध्ये लपवावी लागतील.
पण हे स्फोट करायचे का ? आम्ही तुमच्या बायका मुलांवर आरोप करायचे हे आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवले नाही. मग बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांनी अशा पद्धतीचे राजकारण करायचे आम्हाला शिकवले नाही. ही पातळी आपण ओलांडायची नाही. संस्कार आणि संस्कृतीचा मुद्दा महत्वाचा आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून काम करत असल्याचे दाखवत आहे, हे सगळे राजकीय षडयंत्र आहे. मी सुद्धा भोगलेले आहे. माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटूंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांच्यामुळे हे सरकार हे भाजपचे सरकार येऊ शकले नाही, त्यांना त्रास दिला जातोय. जे लोक भारतीय जनता पक्षाच्या आमिषाला बळी पडत नाहीत, अशा सगळ्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सरकार पाडण्यासाठी त्रास दिला जातोय. तुम्ही कितीही त्रास दिला नाही, तरीही हे सरकार पडणार नाही.