मुंबई : बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपले शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान, असे ट्विट करीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
बैल कितना भी अड़ियल क्यों न हो,
किसान अपना खेत जुतवा ही लेता है।
जय जवान
जय किसान!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2021
नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी मोदी आणि भाजपवर जोरदार टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज पंतप्रधानांवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसेच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली. पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकले असते तर अनेकांचा जीव वाचला असता, असे ते म्हणाले.