घरमहाराष्ट्र"शिंदे गट आधी बाप पळवत होता, आता मुलंही पळवायला लागले", संजय राऊतांची...

“शिंदे गट आधी बाप पळवत होता, आता मुलंही पळवायला लागले”, संजय राऊतांची बोचरी टीका

Subscribe

उद्धव ठाकरे यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. यावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर बोचरी टीका केलीय.

ठाकरे गटातील नेत्यांची गळती काही थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे सत्तासंघर्षाला सामोरे जात असताना दुसरीकडे पक्षातील नेत्यांची बंडखोरी अशा दुहेरी संकटाला ठाकरे गट सध्या समोरे जात आहे. ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मिळालाय. उद्धव ठाकरे यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात हा प्रवेश सोहळा झाला. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. यावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर बोचरी टीका केलीय.

“शिंदे गट आधी बाप पळवत होता. आता मुलंही पळवायला लागले. शिंदे गटाची ही मेगाभरती कुचकामी आहे. शिंदे गटातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याच भूषण देसाईवर आरोप केले होते. त्याची चौकशी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. याच चिरंजीवांना त्यांचे मुख्यमंत्री वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून बसले आहेत. ही भाजपा वॉशिंग मशीनची कमाल आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सामंत यांनी भूषण देसाईवर जे आरोप केले होते, त्याचं काय झालं, याचं उत्तर द्या. सुभाष देसाई यांच्या मुलाने जरी शिंदे गटात प्रवेश केला तरी तो कधीच आमच्या पक्षात नव्हता. यामुळे शिवसेनेच्या वाढीवर काहीही परिणाम होणार नाही. ” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रलंबीत याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “हा सत्तासंघर्ष नाही तर ज्यांनी आमच्यावरती डाका दरोडा घातलाय, त्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिला आहे. या अन्यायाविरोधात ही सुनावणी आहे.”

शितल म्हात्रे मॉर्फिंग व्हिडीओ प्रकरणावरूनही संजय राऊतांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ” शितल म्हात्रेंचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो खरा की खोटा त्याचा शोध घ्या आणि मग मॉफिंग झालंय का याचा तपास करा. या व्हिडीओमधील पुरूष आमदार आहेत ते कुठे आहेत. जशी महिलांची बदनामी होते, तशी बदनामी पुरूषाचीही होते. व्हायरल व्हिडीओवर प्रकाश सुर्वे गप्प का? असा सवाल यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला.

- Advertisement -

तसंच एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशा खूप गोष्टी महाराष्ट्रात घडल्या आहेत आणि घडत आहेत. महिलांची बदनामी होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे. पण काही गोष्टी फक्त राजकारणासाठी आणि सू़डाने कारवायांसाठी वापरल्या जात असतील तर राजकीय कृतीला राजकीय कृतीनेच उत्तर दिलं जाऊ शकतं, असं देखील संजय राऊत म्हणाले.

तसंच एकीकडे सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत, शेतकरी लॉंग मार्च काढत आहेत. याचा अर्थ लोकांच्या मनात खदखद आहे. हे सरकार जनतेच्याविरोधात आहेत, असा घणाघात करत संजय राऊतांनी भाजपवर सुद्धा आपला निशाणा साधलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -