मंगळवारी (ता. 03 मे) राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महानाट्य पाहायला मिळाले. शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गोंधळ घातला. पण या मुद्द्यावरून राज्यात आणखी एका राजकीय वादाला सुरूवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा त्यांनी त्यावेळी संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी पक्षात केलेल्या कुरघोड्यांना वैतागून केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत हे आधुनिक काळातील शकुनीमामा आहेत, अशी टीका देखील नितेश राणे यांच्याकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा – सीमाबांधवांचा प्रचार करावा; राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान
काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1992मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी संजय राऊत यांच्यासारख्या काही माणसांमुळे दिला होता. त्यांनी केलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे ठाकरे कुटुंबामध्ये आग लागली. त्यांनी भावाभावांमध्ये भांडण सुरू केली. पण या सगळ्या गोष्टींना कंटाळून बाळासाहेबांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते कर्जतच्या फार्म हाऊसला निघून गेले. पण त्याठिकाणी नारायण राणे आणि अन्य शिवसैनिकांनी जाऊन त्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यायला लावला. अगदी तसेच आज पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये संजय राऊत यांच्यामुळे होत असल्याचा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.
संजय राऊत सारख्या माणसाला घरात घेण थांबवाव. कारण त्या माणसाला घरात घेतल्यानंतर त्या घराचे वातावरण कसे खराब करायचे?, भांडण कशी लावायची? या गोष्टीवरच राऊतांची रोजीरोटी चालते असा घणाघात नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. पहिल बाळासाहेबांचे घर फोडले आणि अजित दादांच्या विरोधात बोलून मग त्यांचे गोडवे गावून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे काम संजय राऊत करत असल्याचे राणेंनी सांगितले.
शकुनीमामाला पण लाज वाटेल…
वज्रमूठ सभेतील उदाहरण देत नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील वज्रमूठ सभेमध्ये अजित पवार व्यासपीठावर आल्यानंतर संजय राऊत यांनी तोंड वाकड केलं, पण नंतर भाषण देताना मात्र अजित दादांचे गोडवे गायले. त्यामुळे हे सर्व पाहून शकुनीमामाला पण लाज वाटेल आणि तो पण विचार करेल की हा तर माझ्यापेक्षा पण कपटी निघाला. शकुनीमामा बरा होता, असं बोलण्याची वेळ आली आहे, असेही यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले.