शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. मात्र आज सोमय्यांच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी अगदी खरमरीत शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा असं म्हणत राऊतांनी सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर दिलेय.
“शेण खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा”
राऊत म्हणाले की, “माणसाने एकदा शेण खायचं ठरवलं तर शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या. ईडीचे लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात. आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट घेत आहेत. मला माहित आहे सर्व… दबाव टाकू, जेलमध्ये टाकू… अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंड द्या….. हे चालू आहे त्यांचे” असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
“किरीट सोमय्या कोण ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावे”
राऊत म्हणाले की, ” कोण आहेत किरीट सोमय्या ते, मुळात किरीट सोमय्या कोण ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावे आणि अमूक करावे. गुन्हा दाखल करायचा तर करा, मी काय घाबरतो. गुन्हे दाखल करा, खटले चालवा, हे काय आत्ता आहे का, दंगलीच्या काळापासून माझ्याविरोधात खटले चालू आहेत. हे जेव्हा शेपट्या घालून बसले होते बाबरीच्या काळात तेव्हापासून आमच्यावर खटले चालू आहेत ते अजून सुरु आहेत. मला चिंता नाही, असं राऊत म्हणाले.
“मोदी आणि शाहांवर काय कमी आरोप होतायत का?”
“सिद्ध करु द्या, कोणी जे आरोप करत असतील तर सिद्ध करु द्या, आरोप करायला काय जाते. मोदी आणि शाहांवर काय कमी आरोप होतायत का? केंद्र सरकारवर काय कमी आरोप होत आहेत का? फडणवीस मुख्यमंत्री होते कमी आरोप झाले का? आरोप करायला काय?, अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.