अनुसूचित जातीची असल्याने मुंबई पोलिसांनी शिवीगाळ आणि हीन वागणूक दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. या बिनबुडाच्या आरोपांना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पुराव्यासकट उत्तर दिलं आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उघडे पडले आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“गेल्या काही दिवसांपासून पद्धतशीरपणे मुंबई पोलिसांना बदनामी करण्याचं कारस्थान सुरु आहे. कामाच्या पद्धती ज्या आहेत, या अतिरेक्यांच्या आहेत. तपास यंत्रणांवरती हल्ले करायचे. अल कायदा, हिजबूल मुझाहिद्दीन हे सगळे पोलिसांवरती, तपास यंत्रणा, सुरक्ष यंत्रणांवरती हल्ला करुन निराश करतात. तशाच प्रकारचं काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरती हल्ले करत आहेत. संजय पांडे हे कसे चुकीच्या पद्धतीने काम करतात, ते कसे दबावाखाली काम करतात, असे आरोप करत आहेत. संजय पांडे हे सक्षम अधिकारी आहेत, हे सर्वांना माहिती आहे. काल त्यांच्यावरती जो आरोप झाला, राणा दाम्पत्य आहे, मला पाणी दिलं नाही. माझ्या सोबत अस्पृश्य असल्याप्रमाणे व्यवहार केला. तिथे त्यांनी आपली जात काढली. खरं तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोट आहे. त्यामुळे त्यांची जात कोणती हा तपास करावा लागेल. पण आज देशाने संजय पांडे यांचं आभार मानले पाहिजेत. पोलिसांवर लावण्यात येणारे आरोप कसे बिनबुडाचे आणि खोटे असतात हे त्यांनी प्रत्यक्ष पुराव्यासह दाखवून दिलं. आरोपी असलेल्या राणा दाम्पत्याशी मुंबई पोलीस कसे सौजन्याने वागतात. त्यांना बसायला खुर्ची दिली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न विचारले जात आहेत. त्यांच्या समोर पाणी आहे, चहा आहे…चहा पितायत. त्यामुळे कशाकरिता पोलिसांना बदनाम करताय,” असं संजय राऊत म्हणाले.
“या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचा विरोधी पक्ष उघडा पडला. विरोधी पक्षनेते हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अत्यंत जबाबदारपणे आरोप केले पाहिजेत. पण दुर्दैवाने या सगळ्या चिखलफेकीत विरोधी पक्षनेते सामील झालेले आहेत आणि स्वत:वर चिखल उडवून घेत आहेत. राणा प्रकरणात ते उघडे पडले, सोमय्या प्रकरणात ते उघडे पडले आणि पत्र लिहित आहेत केंद्राला महाराष्ट्रात कारवाई करा म्हणून…केंद्रीय गृहखात्याला पत्र लिहिलं आहे या राणा बाईशी नीट वागले नाहीत. या राणा बाईशी किती नीट वागले आहेत याचा प्रत्यक्ष पुरावा आलाय. यावरती आता विरोध पक्षनेत्यांनी बोलायला हवं,” असं संजय राऊत म्हणाले.