शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी आयएनएस विक्रांत नंतर अजून खळबळजनक दावा केला आहे. काही लोकांनी ईडी, सीबीआयच्या धमक्या देऊन बँकॉकमध्ये सौदा करुन पैसे गोळा केले, असा दावा राऊत यांनी केला. धमक्या देऊन परदेशात पैसे कोण स्वीकारत होतं हे सुद्धा हळूहळू बाहेर येईल, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना गंभीर दावा केला आहे. “लोकांना ब्लॅकमेल करुन, ईडीच्या, तपास यंत्रणाची भिती दाखवून कोणी कुठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे गोळा करायला लावले. हे सुद्धा लवकरच बाहेर येईल. इथे ईडी, सीबीआयच्या धमक्या द्यायच्या, तुरुंगात टाकण्याची धमकी द्यायची आणि सौदा करण्यासाठी थायलंड बँकॉकमध्ये व्यवस्था करायची, तिथे पैसे जमा करायचे. अशी अनेक प्रकरणं समोर येतील. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. आमच्यावर संस्कार आहेत, कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही. कुणाच्या कमरेखाली वार करायचा नाही. आम्ही तो केला नाही. सुरुवात तुम्ही केली, तरीसुद्धा आम्ही सयंम बाळगून आहोत. परदेशात धमक्या देऊन पैसे कोण स्वीकारत होतं हे सुद्धा हळूहळू बाहेर येईल,” असं संजय राऊत म्हणाले.
सोमय्यांनी पोलिसांसमोर यावं
विक्रांत फसवणूक प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे संपूर्ण प्रकरण भाजप सरकार सारखं राजकीय सुडापोटी केलेलं नाही आहे. त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आहे. निवृती सैनिक भोसले यांनी तक्रार केली आहे. कोणी किती पैसे गोळा केले हा पोलीस तपासाचा भाग आहे. पैसे गोळा करुन विनीयोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. ज्या प्रकारचे आरोप गेल्या काही वर्षांपासून भाजपचे लोकं आमच्या सारख्यांवर करतात, हा आरोप त्या प्रकारचा नाही आहे. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम निर्माण करायचा. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली तुम्ही पैसे गोळा केले. ५८ कोटींचा आकडा समोर आला आहे. तुम्ही म्हणताय ११ हजार, हा पोलीस तपासाचा भाग. मी काय बोलणार. आम्ही राजकीय सुडापोटी असल्याप्रकारचे आरोप आणि कारवाई करत नाही. तुमच्या मनात भिती नसेल तर मला असं वाटतं पोलिसांसमोर हजर व्हायला हवं. तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी जाताय, तुम्ही पळताय, तुम्ही भूमिगत होताय. तुम्ही इतके महान नेते आहात, तुम्ही इतके महात्मा आहात. तुम्ही आतापर्यंत असंख्य लोकांच्या भ्रष्टाचारावरती हल्ले केलेल आहेत. तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे कायद्यापासून पळू नका आणि आता तुम्हीच पळता. त्यांनी असं पळू नये, माझं त्यांना आवाहन आहे. गुन्हेगारानं कायद्याचं पालन करावं, समोर गेलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.