शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात त्यांची आर्थर रोडच्या जेलबाहेर सुटका होईल. जेलबाहेर शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. परंतु त्यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, संजय राऊतांनी त्याग आणि निष्ठा म्हणजे काय हे दाखवून दिलं, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संजय राऊतांनी त्याग आणि निष्ठा म्हणजे काय हे दाखवून दिलं. बाकीचे झुकतायत, परंतु ते जिद्दीने उभे राहीले. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं येणं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
आम्हाला खूप आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक आणि कडवट शिवसैनिक तसेच वाणी आणि लेखणी धगधगती असलेली मशाल आज पुन्हा बाहेर पडली. त्यामुळे मनस्वी आनंद झाला आहे. न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. देशात संविधानाला धोका पोहोचतोय की काय अशी सर्व अवस्था आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
देशातील न्यायिक संस्था ज्यापद्धतीने वागत आहेत. ईडी, सीबीआय, नार्कोटीक्स, आयकर विभाग या सर्व संस्था ज्यापद्धतीने वागत आहेत. त्या सर्व पाहिल्यानंतर न्याय मिळेल की न्याय अशी शंका वाटावी असं वाटत असताना न्यायलय पाठीशी उभं राहतं हे पाहिल्यानंतर मात्र आनंद होतो. ज्यांचा गेले १०० दिवस छळवाद झाला. परंतु शिवसेनेची धगधगती मशाल बाहेर येत आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा मोठा आनंद झाला आहे, असं सावंत म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी किती महत्त्वाचं?
संजय राऊत यांनी अटक होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संस्था कशा पद्धतीने दुरूपयोग करताहेत हे सांगितलं होतं. तेव्हा ते चुकले नव्हते. ते कधीही झुकले नाहीत, वाकले नाहीत. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांची वाणी तीक्ष्ण आहे, असंही अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटत साजरा केला