भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली करतात हे पाहून आश्चर्य वाटले, फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारावेत असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी सोमय्यांनी महाराष्ट्रात निधी गोळा केला आणि त्याचा वापर स्वतःच्या निवडणुकीसाठी केला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. सोमय्यांची पाठराखण करताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर तोफ डागली होती. यानंतर संजय राऊतांनी पुन्हा फडणवीस सोमय्यांची वकिली करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्रातील नेत्यांवरही निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे नाव घेत तुमच्या नावावर काय चाललंय ते बघा असे वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, कायद्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. अर्थात आपल्या देशात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्यावर परदेशात पळवून पाठवले जाते. पण आयएनएस विक्रांतच्या संदर्भात देश भावना लोकभावना, सैनिकांचे बलिदान याच्याशी खेळ करुन सैनिकांच्या बलिदानाचा बाजारात लिलाव करुन मातृभूमिचा लिलाव करुन बाजार मांडणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील किरीट सोमय्या यांचं एक भयंकर राष्ट्रद्रोही भ्रष्टारातील प्रकरण बाहेर काढलं आहे. इतके होऊनही मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीस राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व शिकवतात परंतु त्यांनी काल एका राष्ट्रद्रोही, देश द्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला हे बघून स्वर्गात गोवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ. हेगडेवार आणि आजचे संघचालक मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल असे संजय राऊत म्हणाले.
अभ्यास करुन बोलणाऱ्या फडणवीसांची देशद्रोहीसाठी वकिली
ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी होऊ शकली त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, लोकांना फसवून काही कोटी रुपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि म्हणतात पुरावे कुठे आहेत. काल फडणवीसांचे वक्तव्य काय होते तर आम्हाला नखे कापून शहीद होण्याची सवय आहे. तुम्ही काय उपटले, तुम्ही काय कापले सांगा या देशासाठी काय बलिदान आहे. ज्यांचे बलिदान आहे त्यांच्या नावाने देशात पैसे गोळा करतात, कधी राम मंदिराच्या नावाने पैसे गोळा केले आहेत. कधी गंगाजल विकून पैसे गोळ केले आणि आमच्या महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान त्याचा लिलाव करुन पैसे गोळा करता आणि पुन्हा त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही वकिली करताय, तुम्ही अभ्यास करुन बोलता असे नेहमी म्हणता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे, भ्रष्टाचार केला नाही. तुमचेच राजभवन आहे. त्या राजभवनात तुमचे आदेश पाळले जातात त्याच राजभवनाकडून उत्तर आलं आहे. अशा शब्दात संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : माझे शब्द लक्षात लिहून घ्या, सोमय्या देशद्रोही, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, राऊतांचा पुन्हा इशारा