महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर भ्रष्टाचाराचे राज्य असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कायतरी द्या वाल्यांचे राज्य गेल्यामुळे त्यांची वेदना मी समजू शकतो असा खोचक पलटवार राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाटत नाहीत या वक्तव्यावरही राऊतांनी फडणवीसांना चपराक लगावली आहे. संजय राऊत म्हणाले की, या राज्यातील ११ करोड जनतेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून स्वतःच मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. ही लोकशाहीमध्ये मोठी गोष्ट असते असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचाराचे राज्य असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावर राऊत म्हणाले की, कायतरी द्या हे राज्य होते महाराष्ट्रातून ते घालवलं आणि कायद्याचे राज्य आले आहे. त्यामुळे कायतरी द्या वाल्यांची वेदना आणि त्यांचे दुःख समजु शकतो असे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचे मानत नाही असे फडणवीस म्हणाले होते यावर राऊतांनी प्रहार केला आहे. या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांना वाटत आहे ही सत्ता माजी आहे हे राज्य माझे आहे. यामुळे फडणवीसांनी मान्य केलं आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. तसं केंद्र सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला आपण मंत्री असल्याचे वाटत नाही. खासदाराला वाटत नाही आपण खासदार आहे.परंतु महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकाला आपण मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. ही लोकशाहीमध्ये खुप मोठी गोष्ट आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. फडणवीस काही बोलत असले तरी ती त्यांची निराशा आहे. अजिर्ण झालं की ते असं बाहेर पडते असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
कंगनावर राऊतांची प्रतिक्रिया
कंगनाने महात्मा गांधी यांचा अपमान केला यावर राऊतांना प्रश्न करण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, वेडे लोक बरळत असतात ते का बरळतात, कोणत्या नशेत असतात, त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं त्यांची तपासणी एनसीबीने करावी असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
पंतप्रधान गांधींना पुष्प अर्पण करतात हे कंगलाना माहित नसावं
चीनने लडाखमध्ये घुसून आपल्या एका गालावर चापटी मारली आहे आता दुसऱ्या गालावर चापटी मारण्यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी सुरु आहे. कश्मीरात पंडितांची हत्या करण्यात आल्या आहेत. कंगना रणौतला माहिती असलं पाहिजे की आज देशाची परिस्थिती काय आहे. महात्मा गांधी जगाचे नायक होते. काही विचार असे असतात ज्यावर मतभेद असू शकतात बाळासाहेब ठाकरे यांनीही महात्मा गांधी यांच्या विचारावर हल्लाबोल केला आहे. तरिही महात्मा गांधी हे या देशाच्या स्वतंत्रता संग्रामला दिशा दाखवणारे आहेत. ते या देशाचे नायक आहेत. जर कोण गांधींना मानत नसेल परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गांधी जयंतीला राजघाटवर जाऊन गांधींजींच्या स्मारक आणि समाधीवर पुष्प अर्पण करतात हे या कंगनाला माहिती पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश