आमदार माजी होतो, खासदार माजी होतो, मुख्यमंत्री माजी होतो परंतू शिवसैनिक कधीच माजी होत नाही तर शिवसैनिक हीच त्याची ओळख राहते असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तुम्ही कुठेही जा, लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सत्ता असो नसो शिवसेना स्टाईलनेच अधिकाऱ्यांकडून काम करुन घ्या असा सल्लाही संजय राऊत यांनी नगर जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यक्रमादरम्यान केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, संसदेत अनेक खासदार येतात त्यांच्यापैकी अनेक खासदारांना कोण ओळखत नाही. मात्र शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जातं कारण शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. तुम्ही पक्ष सोडून कुठेही जा तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच राहते. यामुळे हा नारायण राणे, तो आमका असे म्हणत नाहीत. तो शिवसैनिक आहे असेच म्हटलं जातं म्हणून कुठेही गेलं तरी शिवसैनिक म्हणूनच लोक ओळखणार असल्याचा टोला संजय राऊत यांनी राणेंना लगावला आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी पुढे म्हटलं आहे की, आमदार माजी होतो, खासदार माजी होतो पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही. सत्ता मानसिक अधार असतो त्यामुळे सत्ता असो किंवा नसो तुम्ही शिवसेना स्टाईलनेच अधिकाऱ्यांकडून काम करुन घ्या असे संजय राऊत यांनी कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.
वाघासारखेच मरणार
शिवसेनेत माज असायलाच हवा. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो गडचिरोलीला पाठवू का असा दम देऊ शकतो. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार असे संजय राऊत म्हणाले. शंकरराव गडाख सौम्य बोलतात परंतू हळूहळू तुम्हीही डरकाळी फोडाल, नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
मी पुन्हा येईल
कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी फडणवीस यांचे मी पुन्हा येईल या वाक्याचा उच्चार केला आहे. मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल.. जोपर्यंत शिवसेनेचा झेंडा आहे तोपर्यंत मी पुन्हा येईल असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोला लगावला आहे. तसेच दिल्लीच्या तक्तावरही भगवा फडकवू आणि हारलेल्या जागा पुन्हा जिंकणे हीच बाळासाहेब यांना मानवंदना राहील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.