जवळपास दोन वर्षांनंतर येत्या वर्षी पंढरपूरची आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी केली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळात कोणत्याच यात्रा, सण-समारंभ साजरे केले जात नव्हते. मात्र यावर्षीची आषाढी यात्रा निर्बंधमुक्त असल्याने भाविकांमध्ये वारीला जाण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी ७ वाजता शेगावहून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. दुपारी नागझरी या ठिकाणी महाराजांच्या पालखीचे आगमन होईल तसेच पारस येथे महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
शेगावाच्या दिंडिचे हे ५३ वर्ष असून ७०० भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी ७५० किमी चालत जाणार असून वाटेत लागणाऱ्या पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीच्या निमित्ताने शेगाव हून रवाना झाली. या दिंडी सोहळ्यात ७०० वारकरी सामील झाले असून ही दिंडी भजन, किर्तनाच्या गजरात पाच जिल्ह्यातून ७५० पायी चालत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांनी पांढऱ्या शुभ्र कपड्यात टाळ,मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
अशी असेल गजानन महाराजांच्या पालखीची रूपरेषा
गजानन महाराजांची पालखी सोमवारी ६ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगावच्या मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. नागझरी येथून पालखी पारस येथे पहिला मुक्काम करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पालखी गायगांव येथून भौरद येथे मुक्काम करणार आहे. यावर्षीची आषाढी यात्रा निर्बंधमुक्त असल्याने भाविकांमध्ये वारीला जाण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.