संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. तसेच १० दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे उपस्थितीत आहेत. थोड्याच वेळात न्यायालयात यावर सुनावणी होणार असून त्यानंतर नितेश राणे जामीनासाठी नियमित अर्ज करू शकणार आहेत.
गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी नितेश राणेंच्या वतीने युक्तीवाद केला. तर सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले. तसेच १० दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ बंधु निलेश राणे तसेच वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे देखील आहेत. आता जिल्हा न्यायालयात यावर सुनावणी पार पडेल आणि यामध्ये पोलीस काय भूमिका घेतात? सरकारी वकील काय बाजू मांडतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सुनावणीनंतर नितेश राणे जामिनासाठी नियमित अर्ज करू शकतात.
दरम्यान यापूर्वी संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावून पोलिसांच्या तपासाला सहकार्य केले होते.
हेही वाचा – Santosh Parab Attack Case: नितेश राणेंची अटक अटळ; सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यास दिली १० दिवसांची मुदत