नाशिक : सप्टेंबर उजाडूनही दमदार पावसाची आस कायम असल्याने, त्याचा थेट परिणाम बळीराजासाठी वर्षभर राबणार्या सर्जा-राजाचा सण अर्थात पोळ्यावरही झाल्याचे दिसून आले. पंचवटीसह ग्रामीण भागात बैलांच्या सजावटीसाठी खरेदीसाठी शेतीसाठी पूरक असा पाऊस न झाल्याने शेतकर्यांमध्ये पोळा सणाचा उत्साह कमी दिसत असून बाजारपेठेत साहित्य खरेदी साठी गर्दी कमी असल्याचे बघायला मिळते आहे. त्यातच सजावटीसाठी लागणार्या साहित्याचे देखील दरवाढ झाल्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे पोळा त्यालाच बैल पोळा देखील म्हंटले जाते. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते. पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो.
पंचवटीतील दिंडोरी रोड वरील मुख्य मार्केट यार्ड भागात तालुक्यातील शेतकरी आपले पीक विकायला तसेच शेती करता लागणारे अवजारे, बियाणे व औषधे खरेदीसाठी येत असल्याने अनेक वर्षांपासून पोळा सणाचे साहित्य विक्रीचे दुकाने दिंडोरी रोड, इंद्रकुंड आणि पेठ रोड या भागात मोठ्याप्रमाणात थाटली जात असल्याने यंदाही हि दुकाने लावलेली आहेत. परंतु यंदा शेतीसाठी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे तर शेती मालाला देखील चांगला बाजारभाव न मिळाला असल्याने शेतकरी आपल्या बैलांच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी करता दुकानांवर गर्दी कमी प्रमाणात दिसते. पहिल्यापेक्षा आधुनिक शेतीकडे जरी शेतकरी वळाला असला तरी अनेक शेतकर्यांनी आपल्या अंगणात गाय आणि बैल असावे म्हणून त्यांचा सांभाळ करतांना दिसतात.
शेतकर्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभर्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते. या सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात.
बैलांची मिरवणूक
शहरातील परिसरातील मखमलाबाद, म्हसरूळ, आडगांव, मोरवाडी, सातपूर, अंबड, पिंपळगांव बहुला, गंगापूर, दसक – पंचक, नांदूर आदि गावठाण भागांमध्ये पोळ्याच्या सायं़काळी मिरवणूक काढली जाते. बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घाल़तात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. दोन वर्षांपासून बंद असलेल्या मिरवणूका यावेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक निघणार आहे.