रायगडच्या महाड येथील तळीये दावात दरड कोसळून ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना साताऱ्यातही दरड कोसळल्याची घटना समोर आलीय. सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मोरणा विभागातील खालचे आंबेघर गावातील ४ घरांवर दरड कोसळून त्यात १२ जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आंबेघर येथे बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या दरडीमध्ये १५ हून अधिक घरे दबली गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ढिगाऱ्याखाली १४ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच अनेक स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आंबेघर येथील ४ घरांवर ही दरड कोसळली त्यातील ३ कुटुंबातील लोक गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळ्यानंतर स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी पुढे आले. मात्र पावसाच्या हाहा:कारामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. आंबेघर येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. मात्र आता पर्यंत या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यात दरड कोसळ्याची मालिका सुरुच आहे. पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे देखील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर मोरगिरी किल्ल्याजवळही दरड कोसळून तिथले महादेव मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आहे.
हेही वाचा – रायगडच्या तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात, मृत्यूचा आकडा ३६ वर पोहचला