चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात आम्ही पालिका निवडणूकीत आम्ही दिलेले उमेदवार अंतिम असतील अशी घोषणा केली होती. ‘सर्वांशी सामोपचाराने चर्चा करून हे उमेदवार ठरवले जातील त्यानंतर कोणी फुटला तर त्याचा कार्यक्रम करू’, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सतेज पाटलांवर आरोप केला आहे. ‘कुणी फुटला तर त्याचा कार्यक्रम ठरेल हे पालकमंत्री सतेज पाटलांचे विधान म्हणजे खलेआम दहशत पसरविण्याचा प्रकार आहे’, असा आरोप रविकिरण यांनी केला आहे. रविकिरण यांच्या या वक्तव्यावरून कोल्हापूरात काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेते शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सतेज पाटलांच्या वक्तव्यावर निषेध नोंदविण्यासाठी तातडीने पत्रकार परिषद घेतली. सतेज पाटलांच्या धमकीचा त्यांनी निषेध नोंदवला. पालकमंत्र्यांनी केलेले भाषण बिहारी पद्धतीचे होते हे त्यांना शोभत नाही. स्वाभिमानी जनतेकडून हे खपवून घेतले जाणार नाही, असे आवाहनही इंगवले यांनी केले. शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर सुरू केलेल्या आरोपांमुळे महापालिका निवडणूकीत राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षात वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – शीतल आमटेंच्या मृत्यूच कारण आलं समोर; शवविच्छेदनाचा अहवाल