राज्य सरकारच्यावतीने सुमारे ६२५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आल्या. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या गोंधळातच या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. या गोंधळातच सर्व मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या. राज्य सरकारच्या वतीने सतेज पाटील यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासमोर या मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या.
पुरवणी मागण्यांवर येत्या दोन दिवसात चर्चा होणार आहे. विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही ठिकाणी आज झालेला गोंधळ पाहता दोन दिवसाच्या चर्चेत नेमके कामकाज कसे चालणार हे पाहणे गरजेचे आहे. या मागण्यांसाठी आजच्या दिवशीही पटलावर मांडताना सरकारने रेटून नेण्याची भूमिका मांडली. त्यामुळे चर्चेत काय काय होणार हेदेखील येत्या दिवसात स्पष्ट होईल.
आज राज्यपालांच्या अभिभाषणात झालेल्या गोंधळामुळे राज्यपाल भाषण अर्ध्यातच सोडून निघून गेले. सत्ताधारी पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर सभागृहात विरोधकांकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे राज्यपालांनी भाषणाच्या सभागृहातून काढता पाय घेतला.