नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. त्यातच उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे रोजचं नवे वाद निर्माण होत आहेत. अश्यातच स्वराज्य संघटनेने पुरस्कृत केलेले उमेदवार सुरेश पवार यांनी सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर उपमा दिल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश पवार यांनी सत्यजित यांना थेट औंगजेबाची उपमा दिली आहे.
औरंगजेबाने ज्या प्रकारे कुटिल कारस्थान करून आपल्याच वडिलांना गादीवरून खाली खेचले अगदी त्याच प्रकारे सत्यजित तांबे यांनी देखील वडिलांना उमेदवारी मिळालेली असताना त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना. वडिलांना बाजूला करून स्वताची अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांनी केलेल्या या कृतीमुळेच अद्याप त्यांना कोणाचाच पाठींबा मिळवता आलेला नाहीये. असा गंभीर आरोप सुरेश पवार यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला आहे.
पुढे सुरेश पवार म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ अर्थात हा सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे. मागील काही दिवसातील राजकारण बघितलं तर कुठल्या पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. जे चेहरे होते यांना आपल्याकडे ओढून उमेदवारी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यंदाच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नाहीये. ‘जसं ते औरंगजेबाच्या मुलाने वडिलांना गादीवरून उचलून बाजूला ठेवलं तशी गत इथं झाली आहे. एबी फॉर्म आपल्या हातात असताना सुद्धा मुलाने वडिलांचा मान राखला नाही. वडिलांना बाजूला करून त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तरी त्यांना अजून कोणाचा पाठिंबा मिळवता आला नाही. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत चुरस वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.
मतदार योग्य पद्धतीने मतदान करून एक चांगला सुसंस्कृत प्रतिनिधी निवडण्याचे ते काम करतील. त्याच बरोबर प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे की मतदारापर्यंत पोहचून मताचे दान मागणे, त्यांना आपली भूमिका समजावून सांगणे. ज्या पद्धतीने स्वराज्य संघटना हा आमचा आधारस्तंभ आहे. परंतु जे राजकीय पक्ष असतील, त्यांनाही विनंती करणार असून चांगल्या पद्धतीने मतदान करा. सुसंस्कृत राजकारण करण्याच्या पुढील वाटचालीत काम करतोय. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे जाऊन मतदान मागू शकतो, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.